आश्वासनाची पूर्तता महायुती सरकार करेल का ? शेतकरी बांधव कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

धर्माबाद प्रतिनिधी..दि.(.२)
धर्माबाद : शहर व परिसरातील
शेतकऱ्यांनी थोडा फार पिकविलेला माल घरात आला असताना, त्याला योग्य भाव बाजारपेठेत सध्या मिळत नाही तरीही मातीमोल भावात शेतकरी शेतमाल विक्री करण्यासाठी तयार आहे.
. दुसरीकडे माल विकल्यानंतर शेतकरी कर्ज फेडतील, अशी आशा बँकांना आहे. मात्र, शेतकरी बांधव कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे.
महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता महायुती सरकार करेल, या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.शतकरी कर्ज शासनाने दुटप्पी धोरणाचा त्याग करावा.

■ थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी केली, तर त्यांना नवीन कर्ज मिळेल व शेतीचा गाडा पुन्हा काही प्रमाणात रुळावर येऊ शकतो. एकीकडे शासन मोठ्या उद्योजकांचे कर्ज माफ करते. पण दुसरीकडे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना आखडता हात घेते, असे हे दुटप्पी धोरण शासनाने सोडून सरसकट कर्जमाफी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शेतकरी कर्ज भरण्यास समर्थ जरी असले, तरी यावर्षी अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. ज्यांच्याकडे थोडेफार पैसे आहेत, त्यांनाही कर्ज भरले व कर्जमाफी झाली तर आपले पैसे वाया जातील, असे वाटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या तरी कर्ज भरण्याकडे पाठ फिरविली आहे.

त्यामुळे ते कर्जमाफी होईल या आशेत आहेत.
या आधी महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना २०१९ मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. तशाच प्रकारच्या कर्जमाफीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आता नव्या सरकारकडून आहे. आणि विधानसभेच्या अगोदर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. त्याचप्रमाणे आता त्या आश्वासनाची पूर्तता होईल काय असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे…



