Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
नायगाव धान्य घोटाळा : न्यायालयाचा आदेश धाब्यावर, आरोपी मोकाट; तक्रारदाराच्या जीवाला धोका

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव..
नायगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल झालेल्या गंभीर धान्य घोटाळा प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊनही आरोपींना अटक न केल्याने नायगाव पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर प्रकरणातील आरोपी प्रसिद्ध ठेकेदार सय्यद रहीम व सय्यद रेहमान हे दोघेही खुलेआम नायगाव शहरात फिरत असून, तक्रारदाराला जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार तमलुरे यांनी केला आहे.

नायगाव येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते गजानन रामराव तमलुरे यांनी नायगाव येथील शासकीय रेशन दुकान क्रमांक 90 मधील धान्य अपहार व भ्रष्टाचार प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला. या प्रकरणी मा. प्रथम वर्ग न्यायालय, नायगाव यांनी भारतीय दंड संहिता कलम 420, 467, 468, 471 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी नायगाव ठाण्यात गुन्हा दाखलही झाला.
मात्र इतके स्पष्ट आदेश असूनही, नायगाव पोलिसांकडून अद्याप आरोपींवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. आरोपींना अटक न झाल्याने ते अधिक बिनधास्त झाले असून, तक्रारदार तमलुरे यांना विविध माध्यमातून मारहाण व जीवघेण्या धमक्या देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदार व आरोपी हे एकाच शहरातील रहिवासी असल्याने दररोज आमनेसामने येत असल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
विशेष म्हणजे, या गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहता आरोपींवर यापूर्वीही अशाच स्वरूपाचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून, ते गुन्हे त्यांनी स्वतः कबूल केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
तरीदेखील पोलिसांकडून होणारी निष्क्रियता ही संशयास्पद असून, कुठेतरी आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? असी चर्चा नायगाव शहरामध्ये होत आहे .
या प्रकरणी तक्रारदाराने उपविभागीय पोलीस अधिकारी, बिलोली तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्याकडे आज दि .06/ 02 /26 रोजी लेखी निवेदन देत तात्काळ आरोपींना अटक करून स्वतःच्या जीविताचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे.



