Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरच पाच दुकाने फोडली; नायगावात चोरट्यांचा धुमाकूळ, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

रघुनाथ सोनकांबळे….
नायगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत रविवारी मध्यरात्रीनंतर पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या तब्बल पाच दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.

या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.चोरट्यांनी किराणा दुकान, स्वीट मार्ट, शूज मार्ट, मोबाईल शॉपीसह अन्य दुकानांना लक्ष्य केले. विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी दुकानांसमोरील सीसीटीव्ही कॅमेरे फोडणे, काही कॅमेऱ्यांची दिशा बदलणे अशा प्रकारे पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

त्यामुळे ही चोरी पूर्वनियोजित पद्धतीने आणि टोळीने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.रविवारी सकाळी घटना उघडकीस येताच संबंधित व्यापाऱ्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. मात्र, शहरात यापूर्वीही अनेक छोट्या-मोठ्या चोरीच्या घटना घडल्या असून त्यांतील अनेक गुन्ह्यांचा अद्याप छडा लागलेला नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शहरात भुरट्या चोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आता तर शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत, पोलीस ठाण्याजवळच चोरट्यांनी धाडसी चोरी करून पोलिसांसमोर थेट आव्हान उभे केले आहे. रात्री गस्त असूनही अशी घटना घडल्याने सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.व्यापाऱ्यांनी रात्रीची पोलीस गस्त अधिक प्रभावी करण्याची, चोरीच्या घटनांचा तातडीने छडा लावण्याची आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी कडक आणि शिस्तप्रिय पोलीस नेतृत्वाची आवश्यकता असल्याची चर्चा व्यापारी व नागरिकांमध्ये सुरू आहे.दरम्यान, या चोरीमागे एकट्या चोराचा नव्हे तर संघटित टोळीचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलीसांना विविध अंगांनी तपास करावा लागणार असुन श्वानपथकाला तात्काळ पाचारण करण्यात येणार असल्याचेही कळाले आहे .
या घटनेमुळे नायगाव शहरातील व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.



