नांदेडनायगांवमहाराष्ट्र
जर मनात जिद्द स्वाभिमान आणि समाजासाठी काही करण्याची आग असेल तर तोच माणूस इतिहास घडवतो….. कैलास भालेराव

माणसाच्या जीवनात गरिबी, उपेक्षा, जातीय अन्याय हे सारे अडथळे असू शकतात!
पण जर मनात जिद्द, स्वाभिमान आणि समाजासाठी काही करण्याची आग असेल तर तोच माणूस इतिहास घडवतो.
अशाच असामान्य युगप्रवर्तक साहित्यिक, क्रांतीकारक आणि समाजसुधारक व्यक्तिमत्त्वाचं नाव म्हणजे अण्णाभाऊ होय!
१ ऑगस्ट १९२० रोजी मातंग या उपेक्षित दलित समाजात जन्म झालेल्या अण्णाभाऊंना त्यांच्या बालपणापासूनच सामाजिक अस्पृश्यतेचा सामना करावा लागला.
गरिबीमुळे शिक्षणही पूर्ण होऊ शकले नाही, पण तरीही ते आयुष्याच्या अनुभवातून शिकले आणि आयुष्य हेच त्यांचं विद्यापीठ बनलं.
त्यांच लिखाण हे उपेक्षित, पीडित, दलित, कामगार आणि अस्पृश्य लोकांच्या जगण्यातील वास्तविकता दर्शवते. त्यांनी सुमारे ३५ हून अधिक कादंबऱ्या, १२ नाटके, अनेक कविता, लोकनाट्यं आणि शोधमूल्य लेखन केलं. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये श्रमिकांचा, दलितांचा, विस्थापितांचा आणि शोषितांचा आवाज होता.
फकिरा– एक क्रांतिकारी दरोडेखोराची कथा, ज्याने अन्यायाविरुद्ध बंड केलं.
रशियामध्ये त्यांच्या अनेक साहित्याचे भाषांतर झालं असून त्यांच्या “फकिरा” कादंबीला महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कारही मिळाला आहे.
अण्णाभाऊंनी ही कादंबरी डॉ. बाबासाहेबांच्या लेखणीला अर्पण केली.
अण्णाभाऊंनी लोककलेचा वापर सामाजिक परिवर्तनासाठी केला. त्यांच्या तमाश्यांमधून सामाजिक अन्यायावर प्रहार होत असे. त्यांनी लावणी, पोवाडे आणि कथाकथनातून लोकांमध्ये जागृती केली.
ते म्हणत..“शब्द हे शस्त्र आहे, आणि लेखन हे लढ्याचं साधन आहे.”
अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट विचारांचे समर्थक होते. त्यांनी मजूर संघटना, दलित आंदोलन आणि वंचितांच्या हक्कासाठी आवाज उठवला.
१९४३ मध्ये त्यांनी लाल बावटा संघटनेचे कार्य सुरू केले.
त्याचबरोबर संयुक्त महारष्ट्राच्या चळवळीचे लढवय्ये होते. त्यांनी ‘मुंबई -सह संयुक्त महाराष्ट्रासाठी’ रस्त्यावर उतरून संघर्ष केला.
अण्णाभाऊ साठे यांचं संपूर्ण आयुष्य हे संघर्ष, साहित्य आणि समाजासाठी झगडण्याचं प्रतीक आहे.
अण्णाभाऊ साठे म्हणजे दलितांचे साहित्यिक दूत, श्रमिकांचे क्रांतीकारक, आणि सामाजिक परिवर्तनाचा जाज्वल्य अग्नी.
आजही त्यांच्या विचारांची, लेखनाची आणि कार्याची प्रेरणा लाखो युवकांना न्याय आणि परिवर्तनासाठी झगडण्याची उर्जा देते.
“माझं लेखन हे तळागाळातल्या लोकांचं आयुष्य आहे. मी त्यांच्या दु:खातूनच कविता लिहिल्यात, आणि त्यांच्या संघर्षातूनच कथा जन्माला आल्या.” असे अण्णाभाऊ म्हणत!
अण्णाभाऊंच्या ह्या वर्षीच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावापुढे “भारतरत्न” लागावे त्यासाठी ‘महाराष्ट्र शासनाने’ पुढाकार घ्यावा हीच आम्हा सर्वांची मनोकामना!
सर्व अण्णाभाऊ प्रेमींना जयंती निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा!
आपला स्नेही….




