Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
नायगाव महामार्गावरील अतिक्रमण धारकांना अतिक्रमण नोटीस देऊन तीन महिने उलटले तरी कारवाई नाही — सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांमध्ये नाराजी…

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव…
नायगाव शहरातील नांदेड नरसी रोडलगत असलेल्या नालीवरील अतिक्रमणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, नायगाव यांनी संबंधितांना नोटीस देऊन तीन महिने उलटूनही अद्याप कोणतीही प्रत्यक्ष कारवाई न केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या नोटीसमध्ये नालीलगत सुमारे ५.०० मीटर (सुमारे १६.५० फूट) सार्वजनिक जागेवर खासगी व्यक्तींनी केलेली बांधकामे व वाढीव रचना बेकायदेशीर असून ती तात्काळ स्वतःहून हटवावी, तसे न केल्यास विभागाकडून कारवाई करून त्याचा खर्च संबंधितांवर आकारला जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता. तसेच ७ दिवसांची मुदतही देण्यात आली होती.
मात्र नायगाव महामार्गावरील अतिक्रमणधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्याला दाखवला ठेंगा.

नोटीस देऊन तब्बल तीन महिने उलटले असतानाही अतिक्रमण कायम असून नायगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही यंत्रणा हललेली दिसत नाही. त्यामुळे ‘मग नोटीस देण्यामागचा हेतू काय?’ असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वाहतूक कोंडी होऊन अपघाताचा धोका वाढला आहे. शाळेतील विद्यार्थी व प्रवाशांना बसस्थानकच नसल्याने विद्यार्थ्यांची व प्रवाशांची कोंडी तर होतच आहे परंतु या अतिक्रमणाने प्रवाशांना विद्यार्थ्यांना येथे थांबण्यास जागा सुद्धा मिळत नसल्याने प्रवासी विद्यार्थी अहवाल दिल होत आहेत.तरीही बांधकाम विभागाने ठोस अंमलबजावणी न केल्याने अतिक्रमणधारक अधिकच धिटाईने वागत असून उलट अतिक्रमणात वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.
नोटिसीमध्ये स्पष्ट नमूद केले होते की, मुदत संपल्यानंतर विभाग स्वतः अतिक्रमण हटवेल आणि त्याचा खर्च, दंड संबंधितांवर आकारला जाईल. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई न झाल्याने हा आदेश केवळ कागदोपत्रीच दाखवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना व संबंधितांना खुश करण्याचा प्रयत्न तर झाला नसेल ना अशी चर्चा नायगाव येथे बसस्थानक नसलेल्या रोडवर महामार्ग परीसरात होत असताना दिसत आहे.
प्रवासी व नागरिक आणि विद्यार्थी आता तात्काळ कारवाईची मागणी करत असून, प्रशासनाने विलंब न करता नायगाव नरसी महामार्गावर विशेषतः नायगाव बस स्थानकाच्या अवतीभवती झालेले भरमसाठ अतिक्रमण तात्काळ हटवून मार्ग मोकळा करावा, अन्यथा मोठा लोकक्षोभ उसळू शकतो, असा इशाराही प्रवासी व शाळकरी विद्यार्थी यांनी दिला आहे.
या संपूर्ण प्रकरणात नायगाव सार्वजनिक बांधकाम विभागाची निष्क्रियता प्रश्नचिन्ह निर्माण करत असून, ‘तीन महिन्यांनंतर तरी कारवाई होणार का?’ असा सवाल आता नायगावमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.



