नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिकांच्या शाळा टिकल्या पाहिजेत आणि त्या शाळांना खाजगी शिक्षणसंस्थांच्या बरोबरीने भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, या एकमेव उद्देशाने सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. डॉ. शंकर गड्डमवार यांनी अनोख्या अभियानाची सुरुवात केली आहे.
Screenshot 20251210 103509 Youtube
गेल्या वर्षभरापासून सरकारी शाळा पुन्हा सक्षम करण्याच्या उद्देशाने सातत्याने प्रयत्न करणारे डॉ. गड्डमवार यांनी स्वतःच्या मुलीला जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देत या अभियानाला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली आहे. “सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी वाढले, तर शिक्षकांची पदसंख्या वाढेल आणि गोरगरिबांच्या मुलांनाही रोजगाराच्या संधी निर्माण होतील,” असे ते म्हणाले.
त्यांनी पत्रकार बांधवांना विनंती करताना सांगितले की, सरकार शिक्षणावरचा खर्च सतत कमी करीत असून सध्या तो केवळ २ ते २.५ टक्क्यांवर आला आहे. “शिक्षण नष्ट झाले तर विकासाचा रथ थांबेल; याचे बळी बहुजन समाज होण्याची भीती आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Screenshot 20251210 103454 Youtube
डॉ. गड्डमवार यांच्या मते, प्राथमिक शाळांपासून उच्चशिक्षणापर्यंतच्या संस्थांची अवस्था सुधारण्यासाठी एक देश – एक अभ्यासक्रम ही संकल्पना राबवणे अत्यंत आवश्यक आहे. सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य मंडळातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा समान असताना अभ्यासक्रम वेगळे असणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.
सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत, त्या शाळांमध्ये आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षक आणि सशक्त पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नायगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी या अभियानाकडे सकारात्मक नजरेने पाहून जनतेपर्यंत या चळवळीचा संदेश पोहोचवावा, अशी त्यांनी नम्र विनंती केली.
Screenshot 20251210 103550 Youtube
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित न झाल्यास मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ज्येष्ठ नागरिक व बुद्धिजीवी यांच्या वतीने मोठा मोर्चा काढण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. डॉ. शंकर गड्डमवार – पहिले प्राध्यापक ज्यांनी स्वतःच्या मुलीला जिल्हा परिषद शाळेत दाखल करून सरकारी शाळा व बहुजन विद्यार्थ्यांचे हित जपण्याचा धाडसी पुढाकार घेतला आहे.
अभियान व्यापक करण्यासाठी पत्रकार बांधवांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे ते पुन्हा अधोरेखित करतात. संपर्क : 94 21 76 78 88