मुंबई.. रब्बी हंगाम २०२५-२६ साठी ई-पीक पाहणी नोंदणीची मुदत वाढवण्याबाबतचे निवेदन विधानसभेत सादर करण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शासनाने ही मुदत आता ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवून दिली आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी नोंदणी १०० टक्के पूर्ण करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक ठिकाणी नोंदणी प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त वेळ मिळावा, यासाठी शासनाने ही मुदतवाढ दिली आहे.
याअनुषंगाने संबंधित तालुक्यातील सर्व प्रलंबित ई-पीक पाहणी नोंदी ३१ मार्च २०२६ पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासाठी आवश्यक ती दक्षता घेऊन मोहीम स्वरूपात नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनीही विलंब न करता आपली ई-पीक पाहणी नोंदणी तत्काळ पूर्ण करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.